मंगळवार, ३ नोव्हेंबर, २००९

चारपाई

उत्तर भारतात कुठल्याही गावात जा. शेतकरी शेतात गेलेला असेल, घरातील मुलं शाळेत असतील, आजूबाजूला अगदी कुत्रा-मांजर जरी नसल, तरी एक बाई मात्र तुमच्या स्वागताला कायम अंगणात तत्पर असतील...चारपाई-बाई!


चांदण्या रात्री चारपाई वर झोपून तारे-ग्रह  मोजायची केलेली कसरत, आजीच्या कुशीत बसून ऐकलेल्या गोष्टी, मुलांनी घातलेला धूडगुस...अशा एक न अनेक आठवणी जडलेल्या असतात तिच्याबरोबर. काथ्याने लाकडाच्या चौकटीवर विणलेल्या चारपाईचा  उपयोग केवळ बसण्या-झोपण्यापुरता नसून, अनेक कामाकरीता होतो. वाळवण घालण्यासाठी, कधी आडोसा तर कधी कुंपण म्हणून, स्टंप तर कधी स्ट्रेचर म्हणून, कधी काही वाहवून नेण्यासाठी, घराच्या जन्म-मुत्यु सोहळ्यात चार पायांवर जणू त्या कुटुंबातील  आणि खूपवेळा गावातील घटनांच्या  मूक साक्षीदारच असतात.

पण या चारपाईला सुद्धा माणसाने मानपानातून, नियम-बंधनातून  सोडलेल नाहीये.
मागच्या आठवडयात कानपुर जिल्ह्यातील रसूलाबाद ब्लोक मधील कुरुंगना म्हणून एका छोट्या खेड्यात गेलो होतो...अतिशय टुमदार गाव. कामानिमित्त गावातील आशा (Accredited Social Health Activist) बरोबर गप्पा मारीत असता, एका गरोदर बाई च्या अंगणी आलो. दारात चारपाई होतीच. म्हणून त्यावर बसलो. माझ्या बरोबराची आशा कार्यकर्ता खाली जमिनीवर बसू लागल्या, म्हणून त्यांना म्हटल, ' तुम्हीही वर बसा.'
तशा त्या बाई म्हणल्या, ' मी या गावाची सून आहे.'
मी, ' मग तर तुम्ही बसायलाच हव यावर.'
कार्यकर्ती,' नाही बेटा, तो मान या गावातील मुलींचा. गावातले, सानथोर येतात जातात, कुणी पाहिल तर बर नाही दिसत.'
क्षणात विचार आला, आई शप्पथ! केवढ हे रूढी-परम्परांच  जोखड!

गेल्या वर्षी राजस्थान मधील चुरू जिल्ह्यात एका संशोधन प्रकल्पावर  काम करीत असताना असाच अनुभव आला. मेहरासर नावाच एक छोट गाव आहे; सरदार-शहर जवळ. साधारण संध्याकाळची  वेळ होती, संशोधनाचा एक भाग म्हणून ३०-४० गावकरी जमवले होते. जमिनीवर कस बसवणार म्हणून दोन-तीन चारपाई आणल्या इकडच्या-तिकडच्या घरातून! एकेक गावकरी येऊ लागला तसे आम्ही त्यांना बसण्याची विनंती करीत होतो. पण ४-५ गावकरी कितीही विनंती केली तरी चारपाई वर बसायला तयार होईनात . आणि आम्हीही आग्रह करायचा सोडत नव्हतो. तेंव्हा बरोबर असलेला key-informant मला बाजूला घेउन म्हणाला, "सर, ते खालच्या जातीचे लोक आहेत. तुम्ही कितीही विनंती केली तरी ते चारपाई वर उच्च जातीच्या लोकाबरोबर  बसणार नाहीत. ते गावाच्या नियमाबाहेरच आहे."
अशावेळी कुणाला काही सांगताही येत नाही. मूकपणे स्वत: ला त्या रिती-रिवाजाचा भाग करावा लागत आणि जातीच भूत मानगुटीवर बसवून घ्याव लागत! चारपाई तर इतरांच ओझ वहाता-वहाता वर्षानुवर्षे रिती-रिवाजाच ओझ मुकाटपणे  सोशीतच आहे.
 

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २००९

सारस पक्षी

सध्या मी काम करीत असलेल्या संस्थेचा उत्तर प्रदेशमध्ये काम करणार्या  श्रमिक भारती या NGO बरोबर एक संशोधन प्रकल्प नुकताच सुरु झाला आहे. त्या निमित्ताने मला मागच्या महिन्यात दोनदा कानपूर देहात या जिल्ह्यातील काही गावांना भेटी द्याव्या लागल्या. कानपूर शहर ते  कानपूर देहात असा साधारण ७०-९० km चा प्रवास आहे. जाताना माझ्याबरोबर German सहकारी...Christina होती. शहरातून गावाकडे भरधाव वेगाने निघालो; तरीही गावाकडील संथपणा अंगात भरू लागला. सकाळच्या वेळी  शहरापासून जस-जसे दूर जाऊ लागलो तस-तशी कामावर जाणारयाची घाई, शालेत जाणारया मुलांची फौज तुरलक होऊन  दूरवर पसरलेली हिरवी शेती दिसू लागली. अंगावर गावाकडचा भणान वारा घेत असतानाच मला कधी झोप लागली ते समजलच नाही.
जाग आली ती सोबत असणार्या Christina च्या आवाजाने, "सचिन, लवकर उठ. तो बघ केवढा मोठ्ठा पक्षी!"
तिने ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला लावली. मी डोळे उघडून पाहिले तर साधारण १०० मीटर अंतरावर एक भल्या उंच पक्ष्याचे देखणे जोडपे शेतात उभे होते! साधारण ५-६  फूट उंची...करड्या रंगाचे; सुरइसारखी गर्दन (मान नाहीच ती!) गर्दनीचा वरचा भाग आणि डोके गडद लाल रंगाचे! गव्हाळ रंगाचा मुकुटासारखा शोभणारा माथा. करडे पंख आणि त्यांना काळी गर्द किनार! तांबूस गुलाबी लाम्बच लाम्ब पाय...अशी देखण्या पक्षांची जोड़ी आमच्या समोर उभी होती. पूर्वी कधीही न पाहिलेला असा तो पक्षी! पाषाणच्या तलावावर हिवाळ्यात असंख्य पाहुण्याम्ची गर्दी व्हायची...पण तिथेही कधी न पाहिलेला असा  कोणता हा पक्षी? तेवढ्यात ड्रायव्हर ने सांगितले की हा सारस पक्षी आहे.

सारस...चटकन रामायणातील वाल्मिकीची गोष्ट आठवली. अस म्हणतात की, एका पारध्याला सारस पक्ष्याची शिकार करीत असताना पाहून वाल्मिकीने त्याला शाप दिला. मरत असणारे सारस पाहून वाल्मिकीला रामायण सुचले.
सारस पक्ष्यामध्ये वैवाहिक नीती (marital virtues) अगदी काटेकोरपणे पाळली  जाते.  जोडप्यातील एकाच्या मृत्युनंतर दूसरा पक्षीही लवकरच विरहवेदनेतून मरण याचना करतो.  आणि म्हणूनच की काय गुजरातमध्ये  नवविवाहित जोडप्याला सारस पक्ष्याची जोड़ी दाखवण्याचा रिवाज आहे.
गाडीतून उतरून अधाश्यासारखे फोटो काढायला सुरुवात केली. जेव्हापासून camera घेतला आहे तेव्हापासून एक फार वाईट सवय लागली आहे. निरीक्षण करणयाअगोदर , समोर पहात असलेल मनात कोरण्याअगोदर camera मध्ये टिपायची...बंदिस्त करायची घाई होते. तसा ड्रायव्हर म्हणाला, "वाटेत भरपूर दिसतील, " तेंव्हा आम्ही पुढच्या प्रवासाला  निघालो. माझी फोटो काढण्याची हौस पाहून तो माहिती देऊ लागला, "सारस मादी विणीच्या हंगामात २ दिवसाच्या अंतरात दोनच अंडी घालते आणि मग साधारण एक महिनाभर अंडी उबवल्यावर सारस पक्षी जन्म घेतात."
मी Christina ला म्हणालो, माझ्याजवळ जादूची कांडी हवी होती, म्हणजे मी चटकन सारस पक्षी झालो असतो. एका जोडीदाराला शोधले की आयुष्यभर चिंता नाही!  तशी  तिच्यातील  German बोलली, "तुला काय माहीत त्यांच जीवन किती कष्टाच आहे. दिवसभर उन्हातान्हात उभा रहा, माणूस नावाच्या  प्राण्यापासून  स्वतःचा बचाव करीत फिरा."

 रस्त्यावर जिथे कुठे सारस दिसत होते, त्याप्रत्येकवेळी "अहा हा ! ओ हो हो!" करीत होतो.
रात्री निवांत वेळ मिळाला तेंव्हा श्रमिक भारतीच्या कार्यकर्त्याबरोबर  चर्चा करीत असताना सारस पक्ष्याबद्दल  आणखी माहिती मिळाली.
उत्तर भारतात पावसाळयानंतर हे पक्षी भाताच्या खाचारत आढळतात. कीडे, मासे, बेडूक आणि पाणवनस्पती  हेच त्यांच अन्न. कधीकधी ते दुसरया पक्ष्याची  अंडीही खातात. प्रजनन काळात ते आपल्या जोडीदाराला मोठमोठयाने साद घालतात.  जोडपी  नृत्य-गाण्यात मग्न होतात. भाताच्या खाचारात किंवा दलदली मध्ये गवाता-चिखालाची मोठी घरटी बनवतात. मादी एक किंवा दोन अंडी घालते. कावळे  मात्र त्यांची अंडी खायला टपून असतात.
तो कार्यकर्ता सांगत होता, जगभरात सारस पक्ष्याची संख्या रोडावत चालली आहे.
लगेच माझा प्रश्न, "अजून कुठे आढळतात हे पक्षी?"

त्याच ही तितकच तत्पर उत्तर, " तुमच्या नाशकात, गोदावरी तीरी आढळतात; थायलंड, फिलिपिन्स, बर्मा आणि ऑस्ट्रेलिया या देशात वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. तो पुढे सांगू लागला, देशात कमी होणारी यांची संख्या हा गंभीर प्रश्न आहे. इथे हा पक्षी भाताच्या शेतीचे नुकसान करतो, पण रामायणातील उल्लेखामुले, शेतकरी याला फारस मारीत नाहीत.  प्रदूषण, शिकार, वाढते शहरीकरण यामुळे  जगभरात त्यांची कमी होत आहे".

"मग हा पक्षी वाचवायला हवा," मी.

तो कार्यकर्त्ता, " Wildlife Conservation society ने हा पक्षी दुर्मिळ पक्षी म्हणून घोषित केला आहे आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे. भारतातही वाढत शहरीकरण, शिकार यामुळे संख्या कमी होत आहे. सारस पक्षी रामायणातील उल्लेखापुरता मर्यादित रहाण्याअगोदरच निसर्ग संवर्धनाद्वारे त्याला संरक्षण देण गरजेचे आहे...आणि त्याकरिता  सगळ्याम्नी प्रयत्न करण गरजेचे आहे."   

यावर सगळ्यानी माना डोलावल्या आणि आपापल्या रुमची वाट धरली.

आमची माती आमची माणस!

पाषाण सारख्या पुण्याजवळच्या गावात वीसेक वर्ष राहिल्याने, कधीही चाळी-चौकातल्या मित्रांबरोबर भटकंती करायला पुण्याच्या आजूबाजूच्या गावात फिरण्याची सवय लहाणपणीच जडल्याने, खेड्या-पाड्यांमधील जगण मला नविन नाही. पण तेंव्हा केलेली मुशाफिरी आणि गेल्या पाचेक वर्षापासून social development क्षेत्रात संशोधनाचे काम करीत असताना खेड्यापाड्यांची नव्याने झालेली ओळख यात खूप अंतर जाणवल. विशेषत: उत्तर भारतातील जवळजवळ सर्व राज्यातील दुर्गम गावांत फिरताना; तेथील सामजिक-राजकीय जीवनात डोकावून बघताना नवनविन अनुभव येताहेत, काही गोष्टी नव्याने शिकायला मिळत आहेत; काही वाचल्या-पाहिलेल्या संदर्भाना पडताळता येतय. विविध जाती-धर्माच्या, वेगवेगळ्या उत्पन्न गटाच्या लोकांबरोबर संवाद साधत असताना, India आणि भारतातील दरी अजून कशी खोल-खोल होत आहे, हे स्पष्ट अनुभवायला मिळत आहे. नागरी आणि ग्रामीण संवेदना, लिंगभाव, जातीभेद, शिक्षण क्षेत्रातील दुर्दशा, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी वणवण, आरोग्याच्या सोयिसुविधांची वानवा, सरकारचा दुजाभाव...अशा एक ना असंख्य समस्यांमुळे जगण्यासाठी झगडा करणारा ग्रामीण भारतीय...आणि प्रत्येकवेळी त्याची आणि स्वत:ची नव्याने मला होणारी ओळख!
एका बाजूला संशोधन आणि त्याचे ethics, त्यातून निर्माण होणारी द्विधा मन:स्थिती-हतबलता, विविध development प्रकल्प...काही यशस्वी तर काही पैशाचा अपव्यय, काही तेजीत चालणारे-काही थंडावलेले, कधी संसाधनांची कमतरता तर कधी sustainability चा प्रश्न , संशोधकाचा data पायी असणारा अप्पलपोटेपणा, वेगवेगळ्या स्तरांवर काम करणार्‍या NGOs आणि त्यांची कामे आणि ती पूर्ण करण्याची पद्धत, NGOs मधील राजकारण, पैशाची मदत करणार्‍या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्था, त्यांची गटबाजी...अस काहीस Grey World! तर दुसर्‍या बाजूला वेगवेगळ्या हंगामातील ग्रामीण निसर्ग, सण-समारंभ, त्यातील अद्भुतता असा दुहेरी पण भरपूर काही देणारा अनुभव येत आहे. कामाच्या रेट्यात काही टिपलेल्या गोष्टी, संवाद, कडू-गोड आठवणी, वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेल्या व्यक्ती आणि वल्ली मनात घर करून आहेत, तर काही पुसट होत चालल्याहेत. संशोधनावर आधरित reports, articles, आणि papers लिहीण चालूच आहेत, पण त्या चौकटीत न बसणार, पण तरीही भरपूर देणार, सम्रुद्ध करणार सुटून जाऊ नये म्हणून हा blog चा प्रपन्च! कधी चार-पाच वर्ष मागे जाऊन टिपलेलं काही, तर कधी सध्याच्या प्रकल्पावर काम करीत असताना केलेल्या नोंदी! अमेरिकेत शिक्षण घेण्यापूर्वी आणि घेतल्या नंतर केलेलं काम, त्यातून आलेलं वेगवेगळ्या गोष्टींच भान; असं आणि बरच काही असलेला हा माझा blog...!